चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ नाही... हगवणेंच्या वकिलांकडून युक्तिवाद

 पुणे - Vaishnavi Hagawane  | पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी, पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली, तर आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायाधीशांनी आरोपींना पोलीस कोठडीदरम्यान काही त्रास झाला का, असे विचारले असता, पाचही आरोपींनी ‘नाही’ असे उत्तर दिले. मात्र, आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे पोलिसांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे. (Vaishnavi Hagawane case)



१६ मे रोजी वैष्णवीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. सासरच्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू लता हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना यापूर्वीच अटक केली होती. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या, ज्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

हगवणेंच्या वकिलांकडून खळबळजनक युक्तिवाद

या प्रकरणात, वैष्णवीचा नवरा शशांक, आई लता आणि नणंद करिश्मा यांना एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे, तर सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. फिर्यादीच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करताना सांगितले की, या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण (Nilesh Chavan) याचा शोध घ्यायचा आहे. त्याच्या मोबाईलमध्ये महत्त्वाचे व्हिडिओ शूटिंग असू शकते, जे तपासासाठी उपयुक्त ठरेल. तसेच, आरोपींनी हुंड्यात मिळालेले ५१ तोळे सोने गहाण ठेवले आहे, त्याची माहिती मिळवायची आहे आणि वैष्णवीला मारहाण करण्यासाठी वापरलेली हत्यारे व रॉड हस्तगत करायचे आहेत. या सर्व कारणांमुळे आरोपींना पोलीस कोठडीत ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. (Vaishnavi Hagawane case)

"चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ नाही"

हगवणे कुटुंबीयांच्या (Hagawane family) वकिलांनी आरोपींना पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर थेट भाष्य केले. त्यांच्या युक्तिवादानुसार, वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट उघड झाले होते, ज्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले होते. वकिलांनी दावा केला की, तिने एकदा उंदरांचे विष खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. राजेंद्र हगवणेच्या वकिलांनी निलेश चव्हाणला या प्रकरणात अडकवले जात असल्याचाही दावा केला.

 "प्लॅस्टिकच्या छडीने मारहाण झाली, त्याला हत्यार म्हणायचं का?" असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मारहाणीच्या आरोपांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. वकिलांच्या या दाव्यांमुळे न्यायालयात एकच खळबळ उडाली आणि प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

निलेश चव्हाणला (Nilesh chavan) या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने आरोपी केले जात असल्याचे हगवणेच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यांचा युक्तिवाद होता की, मुलीच्या गळ्यातील गहाण ठेवलेले सोने कोणत्या बँकेत आहे, हे हगवणेंनी आधीच पोलिसांना सांगितले आहे. तसेच, ज्याच्याकडे वैष्णवीचे बाळ होते, त्या निलेश चव्हाणला (Nilesh chavan) आरोपी करणे चुकीचे आहे, कारण त्याने बाळाचा सांभाळ केला आहे. "त्यानेच हेळसांड केली म्हणून त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे," असा आरोप वकिलांनी केला. निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही. तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या, पण त्याला या प्रकरणात आरोपी करणेच चुकीचे आहे, असे वकिलांनी म्हटले. याशिवाय, "आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत, आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करू," असा युक्तिवाद करत वकिलांनी पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म