Maharashtra School | देशभक्ती आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबतची जाणीव लहानपणीच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जाहीर केलं आहे की, येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये महिन्यातून एक दिवस लष्करी प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. (Military Training in Schools)
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षण विभाग अनेक उपक्रम राबवणार आहे. यंदा १६ जूनपासून शाळा सुरू होत असून त्याच दिवशी मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांना भेट देतील. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि शैक्षणिक वर्षाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.”
पहिलीपासून सैनिकी शिक्षण, शालेय उपक्रमांचे कॅलेंडर जाहीर
दादा भुसे यांनी सांगितले की, इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना बेसिक लष्करी प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी माजी सैन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने शिक्षकांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. सुरुवातीला हे प्रशिक्षण महिन्यातून एकदाच दिलं जाईल आणि नंतर टप्प्याटप्याने यामध्ये वाढ केली जाईल. याचाच भाग म्हणून ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्यक्रम देखील घेण्यात येणार आहेत.