DailyMarathiNews - पुणे
पुण्यामध्ये लोहगाव रस्त्यावर दुचाकीवरून घसरून प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे यांचा तीन दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. श्री. रोटे हे निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष पुन: निरीक्षण (एस. आय.आर.) या मोहिमेअंतर्गत बीएलओ चे काम करत होते.
![]() |
| निवडणूक आयोगाने बी.एल.ओ.च्या कुटुंबीयांना ३० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी |
या प्रकरणासंदर्भात निवडणूक आयोगाने प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून ३० लाख रुपये द्यावेत (अनुकंपा तत्त्वावरील कुटुंबीयांना नोकरी व वैयक्तिक किंवा कौटुंबिक विमा योजनेअंतर्गत रक्कम वगळून) व संबंधित प्रकरणाची सखोल प्रशासकीय चौकशी करण्यात यावी, याबाबत पुण्यातील निवडणूक विषयाचे संशोधक डॉ. तुषार निकाळजे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यांना पत्रव्यवहार केला आहे.
या प्रकरण संदर्भात डॉ. तुषार निकाळजे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांना दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी पाठविलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. डॉ. तुषार निकाळजे यांनी २९ डिसेंबर २०२५ रोजी पाठवलेल्या पत्रामध्ये भारतामधील सर्व राज्यांमध्ये मागील दोन वर्षांमध्ये एस आय आर व निवडणूक कर्तव्याच्या वेळी मृत्यू झालेल्या 48 कर्मचाऱ्यांचा व इतर ११७ घटनांचा उल्लेख केला होता. दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी मुख्य निवडणूक आयुक्त यांना पाठविलेल्या पत्रामध्ये भविष्यात अशा घटना घडू नये याबाबत विनंती केली होती.
या पत्रामध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वर्क- लाईफ- बॅलन्स बाबतीत निवडणूक आयोगाने विचार करावा असेही नमूद केले होते.
"एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये याबाबत निवडणूक आयोगाकडून वारंवार सूचना दिल्या जातात, परंतु निवडणुकीचे व एसआयआरचे काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांबद्दल कामकाजामध्ये उपाययोजना का नाहीत? " असा प्रश्न डॉ. तुषार निकाळजे यांनी निवडणूक आयोगास विचारला आहे.
